पावसामुळे श्रीपुर-महाळुंग परिसरातील पालखी मार्गाच्या कामात अडसर
महर्षि डिजीटल न्यूज
अकलूज : अगोदरच पालखीमुळे थांबलेले काम व सततच्या पावसामुळे येत असलेला व्यत्यय यामुळे संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाच्या कामाला अडसर निर्माण झाला आहे परिणामी वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत आहे.
माळशिरस तालुक्यातून जाणाऱ्या श्री संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात आले असले तरी गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे कामात व्यत्यय निर्माण होत आहे. त्या अगोदर पंढरपूरच्या विठ्ठलाच्या भेटीसाठी निघालेल्या तुकाराम महाराजांच्या पालखी बरोबरील वारकऱ्यांना अडथळा निर्माण होऊ नये म्हणून काम थांबवण्यात आले होते.
सराटी ते बोंडले दरम्यानचे बहुतांश काम अंतिम टप्प्यात आले असले तरी श्रीपुर महाळूंग परिसरातील राहिलेल्या कामास पावसामुळे अडथळा निर्माण झाला आहे. संबंधित ठेकेदाराकडून काम पूर्ण करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात असले तरी रखडलेल्या कामाचा वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
याबाबत पालखी महामार्गाचे काम करणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता पाऊस थांबताच काम सुरू करून लवकरात लवकर काम पूर्ण करण्यात येईल असे सांगण्यात आले.