स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी पालकांनी मुलांशी संवाद साधणे गरजेचे : प्रा.संजय हळदीकर
![](https://maharshidigitalnews.com/wp-content/uploads/2024/01/natya-prashikshan-01-780x470.jpg)
महर्षि डिजीटल न्यूज
अकलूज : सध्याचे युग हे स्पर्धेचे युग आहे. या युगात टिकण्यासाठी प्रत्येकाच्या अंगी कला महत्त्वाची आहे. ही कला जोपासण्यासाठी पालकांनी आपल्या मुलांशी व मुलांनी पालकांशी मोकळेपणाने संवाद साधणे गरजेचे आहे असे मत प्रा.संजय हळदीकर यांनी व्यक्त केले.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई शाखा अकलूज च्या वतीने प्रा. संजय हळदीकर यांचे बालनाट्य प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्या प्रसंगी ते बोलत होते.
नाट्य परिषदेच्या कार्याध्यक्ष सौ.शितलदेवी मोहिते-पाटील म्हणाल्या, मुलांच्या अंगी उपजत कलागुण असतात. या कलागुणांना वाव देण्याचे काम कार्यशाळेमध्ये होत असते. पालकांनी अभ्यासाबरोबरच मुलांच्या अंगी असलेल्या कलागुणांना प्रोत्साहन देण्याचे काम करावे. कारण शिक्षण हे मुलांना जगायला शिकवते तर कला ही माणसाला कसं जगायचं हे शिकवते.
यावेळी सिने अभिनेते अजय तपकिरे, शिवरत्न शिक्षण संस्थेचे सचिव धर्मराज दगडे, संचालक श्रीकांत राऊत, माजी ग्रामपंचायत सदस्य राहुल जगताप, सहकार्यवाह सुनील कांबळे यांच्यासह नाट्य परिषदेचे सदस्य व बालकलाकार उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.विश्वनाथ आवड यांनी केले. सूत्रसंचालन नागनाथ साळवे यांनी केले तर आभार रवी नागटिळक यांनी मानले.