शक्तिपीठ महामार्ग होणार की नाही? रविवारी होणार फैसला; माढा मतदारसंघातील निर्णायक बैठकीकडे सर्वांचे लक्ष

महर्षि डिजीटल न्यूज | सागर खरात
अकलूज : माढा लोकसभा संघातून janarya प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाच्या मुद्द्यावर आता निर्णायक टप्पा गाठला असून, या संदर्भातील अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक रविवारी अकलूज येथे पार पडणार आहे. महामार्गामुळे बाधित होणाऱ्या गावांतील नागरिक, शेतकरी आणि विविध संघटनांचे प्रतिनिधी या बैठकीकडे मोठ्या उत्सुकतेने पाहत आहेत. “शक्तिपीठ महामार्ग होणार की नाही?” याचा दिशा ठरवणारा फैसला या बैठकीत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील आणि आमदार उत्तमराव जानकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे या बैठकीला राजकीय तसेच सामाजिकदृष्ट्या विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
रविवार दिनांक १७ मे २०२६ रोजी सायंकाळी ४.३० वाजता अकलूज येथील ‘शिवरत्न’ बंगल्यावर ही बैठक होणार असून, शक्तिपीठ महामार्गामुळे बाधित होणाऱ्या गावांतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
शक्तिपीठ महामार्गाच्या प्रस्तावामुळे अनेक गावांतील शेतजमिनी, घरे आणि स्थानिकांच्या उपजीविकेवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे, विकासाच्या दृष्टीने महामार्ग आवश्यक असल्याचे मतही काही स्तरांतून मांडले जात आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी होणारी बैठक ही केवळ चर्चा नसून पुढील आंदोलन, भूमिका आणि राजकीय दिशा ठरवणारी ठरणार असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, बैठकीपूर्वीच परिसरात राजकीय हालचालींना वेग आला असून, बाधित गावांमध्ये चर्चांना उधाण आले आहे. अनेक ग्रामस्थ, शेतकरी आणि कार्यकर्ते रविवारी होणाऱ्या बैठकीत नेमका काय निर्णय होतो याकडे डोळे लावून बसले आहेत.



