उजनी धरणातील प्रदूषणावर उपायोजनेसाठी खासदार मोहिते-पाटील आग्रही ; केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तातडीची कारवाई करण्याची मागणी

महर्षि डिजीटल न्यूज
अकलूज : भीमा नदी व उजनी धरणातील वाढत्या जलप्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील राजसिंह मोहिते-पाटील यांनी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे (CPCB) अध्यक्ष वीर विक्रम यादव यांची नवी दिल्ली येथे भेट घेऊन तातडीची कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी त्यांनी नदीप्रदूषणामुळे निर्माण झालेल्या पर्यावरणीय आणि जनस्वास्थ्याच्या गंभीर समस्यांवर सविस्तर चर्चा केली.
खासदार मोहिते-पाटील यांनी सादर केलेल्या निवेदनात, भीमा नदीत घरगुती व औद्योगिक सांडपाण्याचा थेट विसर्ग होत असल्यामुळे मानव आरोग्य, शेती, पशुधन आणि पर्यावरणावर मोठा धोका निर्माण झाला असल्याचे नमूद केले. विशेषतः उजनी धरण व सोलापूर परिसरात दूषित जलामुळे आरोग्यविषयक समस्या गंभीर होत असल्याचा मुद्दा त्यांनी अधोरेखित केला.
पुणे, पिंपरी-चिंचवड, चाकण आणि सोलापूर येथील सांडपाणी शुद्धीकरण केंद्रे (STP) कार्यक्षमतेने चालू आहेत का, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, त्यांनी औद्योगिक प्रदूषणाच्या जलतपासणी प्रक्रियेबाबत पारदर्शकता ठेवण्याची मागणी केली. तसेच जलप्रदूषण करणाऱ्या उद्योगांवर कठोर कारवाई करावी आणि नदीच्या जलगुणवत्तेचा अहवाल जनतेसाठी सार्वजनिक करावा, अशी स्पष्ट मागणीही केली.
या चर्चेची गंभीर दखल घेत CPCB चे अध्यक्ष वीर विक्रम यादव यांनी येत्या जानेवारी २०२६ मध्ये भीमा नदी आणि उजनी धरणातील जलप्रदूषणाबाबत तज्ज्ञ पथकामार्फत पाहणी व तपासणी करून ठोस उपाययोजना राबवण्याचे आश्वासन दिले.



