माळशिरस ते पंढरपूर तालुका व इंदापूर ते माढा तालुक्याला जोडणार्या भिमा नदीवरील पुलाच्या बांधकामासाठी निधी मिळावा – आ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी
महर्षि डिजीटल न्यूज
अकलूज : सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील वाफेगाव वाघोली राज्य मार्ग क्रमांक 212 ते पंढरपूर तालुक्यातील करोळे कान्हापुरी प्रजिमा 131 या दोन रस्त्यांना जोडणार्या भिमा नदीवरील मोठ्या पुलाचे बांधकामास मंजुरी प्राप्त व्हावी तसेच निधी उपलब्ध व्हावा.तसेच माढा तालुक्यातील चांदज व इंदापूर तालुक्यातील टणू या गावांना जोडण्यासाठी भिमा नदीवरील पुलाच्या बांधकामास नाबार्ड योजनेअंतर्गत निधी मिळवा. या करीता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आ. रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी पत्राद्वारे मागणी केली.
सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील संगम बाभुळगांव वाफेगांव वाघोली लवंग बोरगांव वेळापूर राज्य मार्ग क्रं. 212 तसेच माढा व पंढरपूर तालुक्यातील पिंपळनेर सापटणे बेंबळे कान्हापुरी करोळे प्रजिमा 131 या दोन भिमा नदीकाठावरील असलेल्या मुख्य रस्त्यांना जोडणारा वाफेगांव वाघोली शिव ते कान्हापुरी गावाअंतर्गत असलेल्या भिमा नदीवर पूलाचे बांधकाम करणे गरजेचे आहे. पंढरपूर व माळशिरस तालुक्यातील भिमा नदीचे काठालगत असलेल्या शेतकर्यांना, गावकर्यांना, शाळकरी विद्यार्थ्यांना भिमा नदी ओलांडणे सोईचे होईल.तसेच पुलाच्या बांधकामामुळे शेतकर्यांना शेतमालाची वाहतूक करणे सोपे होणार आहे.
तसेच मौजे चांदज, ता. माढा, जि. सोलापूर व मौजे टणू, ता. इंदापूर, जि.पुणे या दोन गावांच्या मधून भिमा नदी वाहते. त्यामुळे माढा तालुक्यातील कोंढार भागातील आढेगांव, वडोली, रांझणी, टाकळी नगोली व इंदापूर तालुक्यातील नरसिंहपूर, टणू, पिंपरी बु., गिरवी या गावातील नागरिकांना जाणे येणेसाठी सुमारे 10 किमी चा वळसा घालावा लागतो. तसेच या नदीकाठच्या गावामध्ये ऊसाचे क्षेत्र व फळबागाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. सदर गावांतील शाळकरी मुलांना जाणे येणेसाठी गैरसोय होत आहे.
नागरिकांना दळणवळण करणे सोयीचे होण्याच्या दृष्टीने भिमा नदीवर पूल बांधणे आवश्यक असून त्याकरिता सदरच्या ग्रामपंचायतींनी ग्रामसभेमध्ये ठरावाद्वारे मागणी केलेली आहे. या ठिकाणी पूल झाल्यास माढा व इंदापूर हे दोन जिल्ह्यातील दोन तालुके जोडले जातील त्यामुळे पुणे व सोलापूर जिल्ह्यातील दळणवळण सुरळीत होईल व नागरिकांची व शाळेतील मुलांची गैरसोय दूर होण्यास मदत होईल.
सदर गावातील नागरिकांनी पूलाचे बांधकामा व्हावे या करीता आ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्याकडे विनंती केली असता. आ.मोहिते-पाटील यांनी तातडीने लक्ष घालून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली आहे.