महाराष्ट्र

पालखी महामार्ग भूसंपादानाच्या प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी संयुक्त मोजणी ; प्रांतअधिकार्‍यांच्या स्वागतार्ह भूमीकेला कर्मचारी न्याय देतील का?

महर्षि डिजीटल न्यूज
अकलूज : माळशिरस तालुक्यातून जाणार्‍या संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावरील प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी प्रांतअधिकारी नामदेव टिळेकर यांनी अ‍ॅक्शन प्लॅन तयार केला असून सर्व प्रलंबित विषय मार्गी लावण्यासाठी पुन्हा एकदा संयुक्त मोजणी घेण्याचे आदेश दिले आहेत.  असे असले तरी या मोजणी मध्ये तेच अधिकारी व तेच कर्मचारी असल्याने सदर मोजणीच्या विश्‍वासार्हतेवर शंका उपस्थित केली जात आहे.

जवळपास चार ते पाच वर्षापासून भूसंपादाची प्रक्रिया सुरू असलेल्या संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावर 350 ते 400 प्रकरणे प्रलंबित आहेत. त्यामुळे पालखी महामार्गाचे काम अनेक ठिकाणी रखडले गेले आहे. हे काम मार्गी लावण्यासाठी नव्याने पदभार स्विकारलेले प्रांतअधिकारी नामदेव टिळेकर यांनी अ‍ॅक्शन प्लॅन तयार केला असून संबंधितांशी चर्चा करून त्यांचे काळजीपूर्वक म्हणणे ऐकून घेऊन न्याय देण्याचा त्यांच्याकडून प्रयत्न होत आहे.

याचाच एक भाग म्हणून त्यांनी प्रलंबित प्रकरणाबाबत संयुक्त मोजणी समितीची स्थापना केली असून या समितीमार्फत सर्व प्रलंबित ठिकाणांची पडताळणी करण्यात येत आहे. त्यांच्याकडून आलेल्या अहवालाच्या आधारे निवाडे करून मोबदला अदा करण्यात येणार आहे. या प्रकरणी प्रांतअधिकार्‍यांची भूमीका स्वागतार्ह असली तरी संयुक्त मोजणी समितीमध्ये पुर्वीचेच अधिकारी व कर्मचारी यांचा सहभाग असल्याने पुर्वीचा चर्चित इतिहास पाहता त्यांच्या विश्‍वासार्हतेवर प्रश्‍न निर्माण होत आहे.

अनेक ठिकाणी वाढीव मोबदला तर काही ठिकाणी भूसंपादनात जात नसलेल्या विहीरी, पाईपलाईनचा मोबदला अशा अनेक प्रकरणे यापूर्वी घडली असल्याची चर्चा असल्यामुळे हि संयुक्त मोजणी कितपत प्रामाणिकपणे केली जाईल व प्रांतअधिकारी तथा भूसंपादन अधिकारी याची प्रत्यक्षरित्या पडताळणी करतील का? असे अनेक प्रश्‍न यानिमित्ताने चर्चेचा विषय बनले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!