Latest News

निकृष्ट खतांचा फटका ! शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान ; सदोष खतप्रकरणी दोषींवर कारवाईची खा.धैर्यशील मोहिते पाटील यांची मागणी 

महर्षि डिजीटल न्यूज

अकलूज : माढा तालुक्यातील विविध गावांमध्ये शेतकऱ्यांनी वापरलेल्या निकृष्ट दर्जाच्या खतांमुळे द्राक्ष, कांदा व खरबूज या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. खतांचा वापर केल्यानंतर अवघ्या काही दिवसांत संपूर्ण प्लॉट जळून जाणे, पिके सुकणे व उत्पादन पूर्णतः नष्ट होणे असे प्रकार घडत असून, शेतकऱ्यांचे आतापर्यंत अंदाजे दोन कोटी रुपयांच्या आसपास आर्थिक नुकसान झाल्याची माहिती पुढे आली आहे.


या गंभीर प्रकरणाची दखल घेत खासदार धैर्यशील राजसिंह मोहिते पाटील यांनी सोलापूर जिल्हा कृषी अधिकाऱ्यांना पत्र पाठवून तातडीने चौकशी व कारवाई करण्याची मागणी केली आहे. माढा तालुक्यातील शेतकरी सध्या मोठ्या आर्थिक संकटात सापडले असून, स्थानिक बाजारात विक्रीस असलेल्या काही खतांच्या गुणवत्तेबाबत तीव्र संशय व्यक्त केला जात आहे. वेळेत योग्य कारवाई न झाल्यास आगामी काळात नुकसान आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.


खासदार मोहिते पाटील यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित खतांचे नमुने तात्काळ तपासणीसाठी पाठवावेत, तसेच दोषी उत्पादक, वितरक व विक्रेत्यांवर नियमांनुसार कठोर कारवाई करावी, अशी ठाम मागणी केली आहे. यासोबतच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करून त्यांना योग्य ती नुकसानभरपाई मिळण्यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश देण्याचीही मागणी करण्यात आली आहे.


शेतकऱ्यांच्या हितासाठी या प्रकरणावर त्वरित कार्यवाही करून करण्यात आलेल्या कारवाईचा सविस्तर अहवाल सादर करण्यात यावा, अशी विनंतीही पत्राद्वारे करण्यात आली आहे. निकृष्ट खतांमुळे होणारी शेतकऱ्यांची फसवणूक थांबवण्यासाठी प्रशासनाने तातडीने कठोर पावले उचलावीत, अशी जोरदार मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!