दुबईतील तणावाच्या पार्श्वभूमीवर नातेपुतेकर कुटुंब अखेर स्वगृही परतले

महर्षि डिजीटल न्यूज | सागर खरात
नातेपुते : इराण-इस्त्रायल-अमेरिका यांच्यात वाढत चाललेल्या युद्धजन्य तणावाच्या पार्श्वभूमीवर मध्यपूर्वेत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः dubai येथेही सुरक्षेच्या दृष्टीने तणावपूर्ण परिस्थिती असल्याने तेथे वास्तव्यास असलेल्या भारतीय नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. भारत सरकारकडून नागरिकांना सुरक्षित मायदेशी आणण्यासाठी प्रयत्न सुरू असले, तरी अनेक कुटुंबीयांच्या नातेवाईकांचा जीव मात्र भांड्यात पडल्याचे चित्र दिसत आहे.
अशा परिस्थितीत नातेपुते येथील संजय कोरटकर यांचे कुटुंब दुबईमध्ये वास्तव्यास होते. वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेले मुलगा रणबीर व सून ऐश्वर्या यांच्यासोबत त्यांचा मुलगा शिवांश हे दुबईतील एका निवासी परिसरात राहत होते. युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने त्यांना तातडीने भारतात परतण्याची इच्छा होती. मात्र विमानतळांवरील प्रचंड गर्दी व विमानसेवेमध्ये होत असलेल्या विलंबामुळे मायदेशी परतणे त्यांच्यासाठी अत्यंत कठीण झाले होते.
ही परिस्थिती लक्षात घेऊन आमदार रणजीत सिंह मोहिते पाटील व खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी विशेष प्रयत्न करून संबंधित यंत्रणांशी समन्वय साधला. त्यांच्या प्रयत्नांमुळे कोरडकर कुटुंबाची सुरक्षित प्रवासाची व्यवस्था करण्यात झाली आणि काल हे कुटुंब सुखरूपपणे मायभूमीत परतले.
कुटुंब भारतात परतल्यानंतर नातेवाईक व स्थानिक नागरिकांनी त्यांचे आनंदाने स्वागत केले. विशेष म्हणजे, संजय कोरडकर हे स्वतः चार दिवसांपूर्वीच सुरक्षितपणे भारतात परतले होते. ते आपल्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी २६ फेब्रुवारी रोजी दुबईला गेले होते.



