पिकअप थेट विहिरीत कोसळली; 8 जणांचा मृत्यू, सिद्धनाथ दर्शनावरून परतताना काळाचा घाला

महर्षि डिजीटल न्यूज | सागर खरात
माळशिरस : म्हसवड येथील श्री सिद्धनाथ मंदिराचे दर्शन घेऊन परतणाऱ्या पंढरपूर तालुक्यातील रांजणी गावातील भाविकांवर काळाने घाला घातला. माळशिरस तालुक्यातील तांदूळवाडी परिसरात भाविकांची पिकअप गाडी रस्त्यालगतच्या विहिरीत कोसळून भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत लहान मुले व महिलांसह 8 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून 6 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रांजणी (ता. पंढरपूर) येथील भाविक श्री सिद्धनाथांच्या दर्शनासाठी म्हसवड येथे गेले होते. दर्शन आटोपून सर्वजण पिकअप वाहनातून गावाकडे परतत असताना तांदूळवाडी परिसरात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे भरधाव पिकअप थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या खोल विहिरीत कोसळली. विहिरीत पाणी असल्याने वाहनातील प्रवाशांना बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही.

अपघाताची माहिती मिळताच तांदूळवाडी परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. विहिरीतून वाहन व मृतदेह बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचा समावेश असल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच रांजणी गावासह संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे.

टीप : मृतांचा आकडा आणि इतर माहिती अधिकृत प्रशासनाकडून जाहीर झाल्यानंतर बदलू शकते.



