Latest News

“सोलापूर जिल्ह्यातील रेल्वे प्रकल्प, एफएम केंद्र आणि कार्गो टर्मिनल साठी खा.धैर्यशील मोहिते पाटील यांची रेल्वेमंत्र्यांकडे आग्रही भूमिका”

महर्षि डिजीटल न्यूज | सागर खरात

अकलूज : सोलापूर जिल्ह्याच्या वाहतूक, व्यापार, शेती आणि दळणवळणाच्या विकासाला गती देण्यासाठी खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी केंद्रीय रेल्वे व माहिती-प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांची नवी दिल्ली येथे भेट घेऊन पूर्वी मांडलेल्या विविध महत्त्वाच्या मागण्यांचा पाठपुरावा केला.

यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील मोडनिंब येथे गतीशक्ती मल्टी-मॉडेल कार्गो टर्मिनल (GCT) उभारणी लवकरात लवकर करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. या प्रकल्पामुळे औद्योगिक तसेच कृषी मालवाहतूक सुलभ होऊन स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. 

तसेच, सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरलेली आणि सध्या बंद असलेली दिल्ली कोलकत्ता मुजफ्फरनगर शालिमार येथे जाणारी किसान रेल्वे सेवा पुन्हा सुरू करावी,व अकलूज शहरात एफएम रेडिओ केंद्र स्थापन करण्यासाठीच्या मागणीचा देखील पाठपुरावा केला.

याशिवाय दादर -पंढरपूर -सातारा -दादर ही रेल्वे दररोज चालवून तिला “चंद्रभागा एक्सप्रेस” असे नाव द्यावे, तसेच वारकरी आणि प्रवाशांच्या सोयीसाठी पंढरपूर-देहू मेमू रेल्वे सेवा सुरू करावी, अशी मागणीही करण्यात आली. 

लातूर–कुर्डूवाडी–सोलापूर व मिरज–कुर्डूवाडी–दौंड ‘कॉर्ड लाईन’ उभारणीसाठी तसेच मिरज–कुर्डूवाडी–लातूर रोड (सुमारे ३७५ किमी) रेलमार्गाच्या दुहेरीकरणासाठी जमीन अधिग्रहण व आवश्यक कार्यवाही तातडीने करावी, अशी मागणी खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी केली.

तसेच सोलापूर रेल्वे विभागांतर्गत वाढती लोकसंख्या व पंढरपूरकडे येणाऱ्या लाखो वारकऱ्यांची सोय लक्षात घेऊन सांगोला तालुक्यातील जवळा व बामणी, पंढरपूर तालुक्यातील बाभुळगाव तसेच माढा तालुक्यातील म्हैसगाव व लऊळ येथे नवीन रेल्वे स्थानके उभारण्याचा प्रस्ताव मंजूर करावा, अशीही मागणी करण्यात आली.

दरम्यान, कुर्डुवाडी–पंढरपूर मार्गावरील जुना मीटर गेज रेल्वे ट्रॅक सध्या वापरात नसून त्या ठिकाणी रेल्वेची मौल्यवान जमीन रिक्त अवस्थेत पडून आहे. या जमिनीचा विकासात्मक वापर करून तेथे “व्यापारी संकुल उभारण्यात यावे, अशी मागणी व त्याचा पाठपुरावा खासदार मोहिते-पाटील यांनी केला.

या सर्व मागण्यांवर सकारात्मक विचार करून आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिल्याची माहिती देण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!