आ. रणजितसिंहांकडून कार्यकर्त्यांना धक्कादायक पण गोड सरप्राईज रिटर्न गिफ्ट ! दादांनी मन जिंकले, कार्यकर्त्यांचे डोळे पाणावले

महर्षि डिजीटल न्यूज | सागर खरात
अकलूज : राजकारणात वाढदिवस म्हणजे मोठमोठे होर्डिंग्स, हार-तुरे आणि शक्तीप्रदर्शन हे समीकरण आपण नेहमीच पाहतो. पण अकलूजच्या ‘शिवरत्न’ बंगल्यावर ५ मे रोजी जे घडले, त्याची चर्चा आता संपूर्ण जिल्ह्यात रंगली आहे. आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधत कार्यकर्त्यांना दिलेल्या अनोख्या सरप्राइज रिटर्न गिफ्ट मुळे कार्यकर्ते अक्षरशः भारावून गेले आहेत.
५ मी रोजी सकाळ पासूनच शिवरत्न बंगला कार्यकर्त्यांच्या गर्दीने फुलून गेला होता. शुभेच्छांचा वर्षाव सुरू होता. याच गर्दीत डोंबाळवाडीचे माजी सरपंच व बाजार समितीचे संचालक आप्पासाहेब रुपनवर, पुरंदवडेचे उपसरपंच व बाजार समितीचे संचालक देविदास ढोपे, बाजार समितीचे संचालक आनंद फडे आणि नातेपुतेचे रफिक काझी हे निष्ठावान कार्यकर्तेही रणजितदादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला आले होते.
रणजितदादांनी या चौघांनाही जवळ बोलावले आणि प्रेमाने शब्द टाकला, “नाश्ता करून घ्या आणि थोडा वेळ थांबा, काम आहे.” दादांनी थांबायला सांगितल्यामुळे काहीतरी काम असेल, या विचाराने हे चौघेही साध्या अपेक्षेने थांबले. पण त्यांच्या नशिबात आज काहीतरी ‘रॉयल’ लिहिलं होतं, याची पुसटशी कल्पनाही त्यांना नव्हती.
दुपारी दीड वाजता अचानक निरोप आला, “गाडीत बसा!” आणि गाडी थेट हेलिपॅडच्या दिशेने निघाली. हेलिकॉप्टर पाहून कार्यकर्त्यांना वाटलं की दादांना निरोप द्यायला आपण आलो आहोत. पण तितक्यात रणजितदादांचा आदेश दिला… “चला, आता हेलिकॉप्टरमध्ये बसा… मला मुंबईला सोडून या!” हे शब्द ऐकताच कार्यकर्त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. ज्यांनी हेलिकॉप्टर कधी जवळून पाहिले नव्हते, त्यांना थेट त्यात बसून गगनाला गवसणी घालण्याची संधी मिळाली होती.

अकलूजवरून जेव्हा हेलिकॉप्टरने झेप घेतली, तेव्हा दहिगाव, गुरसाळे, भीमनगर आणि राजुरीचा परिसर आकाशातून न्याहाळताना कार्यकर्त्यांच्या भावना दाटून आल्या. दीड तासाचा हा प्रवास थरारक होता. वाटेत पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक अविनाश भोसले यांच्या फार्महाऊसवर झालेला पाहुणचार आणि मुंबईत उतरताना दिसलेला मुकेश अंबानींच्या ताफ्याचा लवाजमा, हे सगळं त्यांच्यासाठी एखाद्या स्वप्नवत चित्रपटासारखं होतं.
प्रवासानंतर भावूक होत आप्पासाहेब रुपनवर पाटील म्हणाले, “आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला दादांनी आकाशाची सफर घडवून आणली, यापेक्षा मोठं गिफ्ट दुसरं काय असू शकतं? हा केवळ प्रवास नव्हता, तर दादांचं आमच्यावर असणारं प्रेम होतं.”
राजकारणात नेते आणि कार्यकर्त्यांचे संबंध अनेकदा औपचारिक असतात. मात्र, आपल्या खास दिवशी कार्यकर्त्यांना ही ‘शाही’ वागणूक देऊन आ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी आपली कार्यकर्त्यांशी असलेली नाळ किती घट्ट आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध केले.
आजवर अनेक वाढदिवस झाले असतील, पण ‘अकलूज ते मुंबई’ हा कार्यकर्त्यांचा हवाई प्रवास जिल्ह्याच्या राजकारणात वर्षानुवर्षे चर्चेत राहणार, हे नक्की!



